मुंबई, ११ जून २०२५ : Maharashtra Farmers Sowing Advice Delayed Monsoon Update June 2025 – राज्यात मान्सूनचा वेग मंद असल्याने कृषी विभागाने शेतकऱ्यांना १५ जूनपर्यंत पेरणी न करण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, वीजांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून मच्छीमारांनाही समुद्रात न जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पावसाची सद्यस्थिती, धरणांतील पाणीसाठा आणि बी-बियाण्यांच्या उपलब्धतेचा आढावा घेण्यात आला.
महाराष्ट्रातील मान्सून १५ जूननंतर सक्रिय
कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी मंत्रिमंडळास माहिती दिली की, राज्यात १५ जूननंतर मान्सून पूर्णतः सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करण्यासाठी अजून थोडी वाट पहावी, असे आवाहन त्यांनी केले.
आतापर्यंत किती पाऊस?
राज्यातील पावसाची सद्यस्थिती अशी आहे:
१७ जिल्ह्यांमध्ये २५% पेक्षा कमी पाऊस
१२ जिल्ह्यांत २५% ते ५०% दरम्यान पाऊस
४ जिल्ह्यांमध्ये ५०% ते ७५% दरम्यान
फक्त १ जिल्हा १००% पावसाच्या वर
कृषी विभागानुसार, बी-बियाण्यांचा पुरवठा समाधानकारक आहे आणि पेरणीसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध आहे.
पुढील पावसाचा अंदाज
Rain Alert Maharashtra : हवामान विभागाच्या संचालिका शुभांगी भुते यांनी सांगितले की, पुढील २ – ३ दिवसांत मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.
विभागनिहाय पावसाचा अंदाज:
मराठवाडा: १२ ते १४ जून दरम्यान पाऊस
कोकण आणि गोवा: १२ ते १५ जून दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज
मध्य महाराष्ट्र: १३ ते १५ जून दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता
मच्छीमारांना इशारा
हवामान खात्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन केले आहे. तसेच, विशेषतः वीज आणि पूर परिस्थिती लक्षात घेता सामान्य नागरिकांसाठीही खबरदारीचे निर्देश देण्यात आले आहेत.
धरणांतील पाणीसाठा समाधानकारक
राज्यातील महत्त्वाच्या धरणांमध्ये पाणीसाठा समाधानकारक असून तो मागील वर्षीच्या तुलनेत चांगल्या स्थितीत आहे.
शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून पेरणीसाठी योग्य वेळेची वाट पहावी, यामुळे पीक नुकसान टळेल आणि चांगल्या उत्पादनास मदत होईल.
हेही वाचा : PAN कार्डवरील १० अंकी नंबरचा अर्थ माहिती आहे का? येथे जाणून घ्या संपूर्ण माहिती.