मुंबई | २४ मे २०२५: Maharashtra Government Employees DA Hike 2025 – महाराष्ट्रातील लाखो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारनेही महागाई भत्तावाढीचा (DA Hike) निर्णय घेण्याची तयारी केली असून, जुलै २०२५ मध्ये याबाबत अधिकृत शासन निर्णय (GR) जाहीर होण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने मार्च २०२५ मध्ये आपल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवून ५५ टक्क्यांवर नेला होता. त्यानंतर अखिल भारतीय सेवेतील (AIS) अधिकाऱ्यांसाठी ही वाढ लागू करण्यात आली आहे आणि ती जानेवारी २०२५ पासून प्रभावी ठरणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचे आदेश यापूर्वीच काढले आहेत.
राज्य सरकारनेही परंपरेनुसार अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या भत्तावाढीनंतर १५ ते २० दिवसांत राज्य कर्मचाऱ्यांसाठीही समान वाढ जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विश्वसनीय सूत्रांनुसार, जुलै महिन्यात या निर्णयावर शिक्कामोर्तब होऊ शकते.
या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सध्याच्या ५३ टक्क्यांवरून वाढून ५५ टक्क्यांवर जाणार आहे. विशेष म्हणजे, ही वाढ जानेवारी २०२५ पासून लागू राहणार असल्याने, जानेवारी ते जून या सहा महिन्यांचा फरक कर्मचाऱ्यांना एकरकमी मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात आणि तामिळनाडू या राज्यांनी आधीच त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढवलेला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारकडूनही लवकरच अधिकृत घोषणा होईल, अशी कर्मचारी संघटनांची अपेक्षा आहे.
🔴 हेही वाचा 👉 तुमच PAN कार्ड अॅक्टिव्ह आहे का? 2 मिनिटात घरबसल्या अस तपासा स्टेटस.