Kharif Crop Insurance : शेतकऱ्यांची गेल्या खरीप हंगामातील नुकसान भरपाईची प्रतीक्षा अखेर संपली असून, महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तब्बल १५९ कोटी २१ लाख रुपयांची पीक विमा भरपाई थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. ही भरपाई पंतप्रधान पीक विमा योजना (PMFBY) अंतर्गत मंजूर करण्यात आली असून, त्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पुणे विभागासाठी या योजनेअंतर्गत एकूण २८३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, त्यापैकी सर्वाधिक वाटा अहिल्यानगर जिल्ह्याला मिळाला. नेवासा तालुक्यातील ४४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना तब्बल ४६ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे. याशिवाय पाथर्डी, शेवगाव, श्रीगोंदा, संगमनेर, अकोले आदी तालुक्यांतील हजारो शेतकऱ्यांनाही लाभ मिळाला आहे.
विमा कंपनीकडून बहुतांश रक्कम आधीच वितरित करण्यात आली असून, उर्वरित पात्र शेतकऱ्यांना लवकरच शिल्लक रक्कम मिळण्याची अपेक्षा आहे. या भरपाईमुळे खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात मिळाल्याचे स्पष्ट होत आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीची दखल घेऊन सरकारने तातडीने भरपाई वितरण करण्याचा निर्णय घेतला होता.
शेतकरी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, भविष्यातही अशाच तत्परतेने योजना राबवण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
🔴 हेही वाचा 👉 महाराष्ट्रात उद्या बँकांना सुट्टी; सलग तीन दिवस बँका बंद.