Maharashtra Monsoon 2025 Arrival Complete Coverage : यंदाचा मॉन्सून अखेर संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचला आहे. तब्बल तीन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा वेग पकडलेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी मंगळवारी विदर्भातील उर्वरित भाग व्यापत राज्यभर आपला विस्तार केला. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे.
विक्रमी प्रारंभ, पण मधली खंडित चाल
मॉन्सून यंदा विक्रमी वेगाने २४ मे रोजी केरळ आणि कर्नाटक किनारपट्टीवर दाखल झाला होता. लगेचच २५ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत आणि २६ मे ला मुंबई, पुणे, धाराशिव जिल्ह्यांपर्यंत पोहोचला. १९९० नंतर प्रथमच मॉन्सून एवढ्या लवकर महाराष्ट्रात दाखल झाला होता. मात्र, पुढे त्याच्या प्रगतीला खंड बसला.
तीन आठवड्यांनंतर पुन्हा गती
मुंबई, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागांपर्यंत मजल मारल्यानंतर मॉन्सून थांबला होता. पण 16 जून रोजी तो पुन्हा सक्रिय झाला आणि 17 जूनला महाराष्ट्रात उर्वरित विदर्भासह संपूर्ण राज्य व्यापले.
हवामान विभागाचा अंदाज
सध्या मॉन्सून गुजरात, ओडिशा, पश्चिम बंगाल, छत्तीसगडच्या बहुतांश भागात पोहोचला आहे. तर मध्य प्रदेश, बिहार, झारखंडमध्येही काही भागांत मॉन्सून दाखल झाला आहे. हवामान विभागानुसार, पुढील दोन दिवसांत मॉन्सून उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार आणि झारखंडच्या उर्वरित भागात पोहोचण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : ATM मधून पैसे काढण महागणार, RBI चा नवा आदेश.