Monsoon Update 2025 : देशभरात वळवाच्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण केला असला तरी खऱ्या मान्सूनची सुरुवात अजूनही झालेली नाही. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, २९ मेपासून नैऋत्य मान्सूनचा प्रवास थांबलेला असून पुढील काही दिवसांतही त्याला चालना मिळण्याची फारशी शक्यता नाही.
भारतीय हवामान विभागाने (IMD) सांगितले आहे की, १२ ते १८ जून या कालावधीत मान्सून पुन्हा पुढे सरकण्याची शक्यता आहे. मात्र, या दरम्यान उष्णतेच्या लाटेचा अनुभव अनेक राज्यांत होणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. सध्या कोरड्या हवेच्या प्रवाहामुळे मान्सूनचा वेग मंदावलेला असून त्याचा परिणाम देशाच्या उत्तर आणि पश्चिम भागांवर स्पष्टपणे दिसून येत आहे.
दिल्लीसह वायव्य भारतात पुढील काही दिवस तापमानात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शनिवारी दिल्लीतील तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचले होते. पुढील पाच दिवसांमध्ये तापमान ३-४ अंशांनी वाढेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. यामुळे पंजाब, हरयाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि पश्चिम राजस्थानमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
देशाच्या विविध भागांमध्ये सध्या तापमान सामान्यपेक्षा कमी असले तरी, पुढील काही दिवसांत परिस्थितीत मोठा बदल होईल. विशेषतः राजस्थानमध्ये ९ जूनपासून तर इतर राज्यांत १० जूनपासून उष्णतेची तीव्र लाट जाणवेल.
मान्सूनचा प्रवास थांबला असल्याने त्याला चालना मिळण्यासाठी आणखी काही वेळ लागणार आहे. साधारणतः ८ जुलैपर्यंत मान्सून देशभर पसरतो. यंदा मात्र नैऋत्य मान्सूनच्या सुरुवातीला गती असली तरी मध्य जूनपासून त्याचा वेग मंदावलेला आहे.
हेही वाचा : PF खात्यातून काढा आता थेट ATM द्वारे किंवा UPI च्या माध्यमातून एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम.