मुंबई | ४ जून २०२५ : Maharashtra Paus Andaj — महाराष्ट्रात यंदा मान्सून वेळेपेक्षा लवकरच दाखल झाला असला, तरी आता त्याच्या गतीने चिंता वाढवली आहे. सुरुवातीच्या दमदार हजेरीनंतर मोसमी वाऱ्याची गती मंदावल्याने कोकण, मुंबई, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पारा पुन्हा चढू लागला आहे. याउलट विदर्भात काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे.
Maharashtra Monsoon : हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पुढील २४ तासांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र, राज्याच्या इतर भागांत उष्णता कायम राहणार असल्याने नागरिकांनी उष्माघातापासून दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात विक्रमी पावसाची नोंद झाली होती. मे महिन्याच्या अखेरीस सिंधुदुर्गात ५६४ मिमी पावसाची नोंद झाली, जी राज्यातील सर्वाधिक पावसाची नोंद होती. मात्र जून महिन्यात मान्सून स्थिरावल्याने आणि कमी दाबाचा पट्टा कमजोर झाल्याने पुढील काही दिवस तरी मुसळधार पावसाची शक्यता कमी असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.
शेतकऱ्यांमध्ये वाढती चिंता
पावसाने चकवा दिल्याने विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. शेतीची तयारी सुरू असली, तरी पाऊस स्थिर न झाल्याने पेरण्या लांबणीवर जात आहेत. सरकारने देखील कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांना परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
पुन्हा कधी सक्रिय होईल मान्सून?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या ७ ते ८ दिवसांत मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. मात्र तोवर राज्यातील बहुतांश भागांमध्ये उकाडा कायम राहील आणि आर्द्रतेचे प्रमाणही वाढलेले असेल.
हेही वाचा : असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी महत्त्वाची योजना; दर महिन्याला मिळतात ₹3,000, अर्जासाठी ही कागदपत्रे आवश्यक.