मुंबई | ४ जून २०२५ : Gharkul Yojana Maharashtra 2025 Houses Approved — केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण अंतर्गत महाराष्ट्रातील ग्रामीण भागासाठी ३० लाख घरकुलांचे लक्ष्य मंजूर करण्यात आले आहे. ८०,००० कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक असलेल्या या योजनेमुळे राज्यातील गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना हक्काचे घर मिळणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुणे येथील छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलात आयोजित राज्यस्तरीय महाआवास अभियान पुरस्कार सोहळ्यात याबाबतची माहिती दिली. या वेळी केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे देखील उपस्थित होते.
‘घरकुल युक्त राज्य’ होण्याच्या दिशेने महाराष्ट्राचा पुढाकार
फडणवीस यांनी सांगितले की, हे अभियान यशस्वी झाल्यास महाराष्ट्र देशातील पहिले “घरकुल युक्त राज्य” ठरेल. आतापर्यंत ‘आवास प्लस’ अंतर्गत ३० लाख कुटुंबांची नोंदणी झाली असून, यापैकी २० लाख घरकुलांना केंद्राची मंजुरी मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात १० लाख घरांसाठी निधी वितरित झाला असून, उर्वरित १० लाखांना नुकतीच मान्यता मिळाली आहे.
मध्यमवर्गीयांनाही मोठा दिलासा
पूर्वी फक्त अतीदुर्बल घटकांसाठी मर्यादित असलेली ही योजना आता मध्यमवर्गीय कुटुंबांसाठीही खुली करण्यात आली आहे. ₹15,000 मासिक उत्पन्न, दुचाकी मालकी, २.५ एकर बागायती किंवा ५ एकर जिरायती जमीन असलेले ग्रामीण कुटुंब आता योजनेसाठी पात्र असणार आहेत.
घरासोबत मूलभूत सुविधा आणि विशेष अनुदान
घरकुल योजना केवळ निवाऱ्यापुरती मर्यादित नसून, लाभार्थ्यांना वीज, पाणीपुरवठा, शौचालय, रस्ता, गॅस कनेक्शन आणि मनरेगा अंतर्गत रोजगार अशा सर्व सुविधा पुरविल्या जातील. शिवाय प्रत्येक घरासाठी ₹50,000 अतिरिक्त राज्य अनुदान, तसेच ‘दीनदयाल उपाध्याय घर खरेदी अर्थसहाय्य योजने’तून ₹1 लाख मदत दिली जाणार आहे.
सन्मानपूर्वक जीवनाची दिशा
ही योजना केवळ घरबांधणीपुरती नाही, तर ती एक सर्वसमावेशक ग्रामीण जीवनमान उन्नती योजना आहे. निवारा, सुरक्षितता, स्थैर्य आणि सन्मान या चारही बाबतीत ग्रामीण भागातील कुटुंबांना यातून मोठा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्रात हे अभियान ग्रामीण परिवर्तनाचे नवीन पर्व सुरू करत आहे.
हेही वाचा : घरबसल्या करा अर्ज आणि मिळवा मोफत वीज; आतापर्यंत 1.5 कोटी नागरिकांनी घेतला लाभ.