लाडकी बहिण योजनेत मोठा बदल? – ५० लाख महिलांचे अर्ज रद्द करणार, ‘सरकारनामा’च्या वृत्तानुसार आयकर खात्याकडून माहिती मागवली Ladki Bahin Yojana Latest Update

2 Min Read
Ladki Bahin Yojana 50 Lakh Women May Be Declared Ineligible Sarkarnama Report

मुंबई | ३ जून २०२५ : Ladki Bahin Yojana Latest Update – महाराष्ट्र सरकारच्या बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) अंतर्गत मे महिन्याचा हप्ता अद्याप अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. हफ्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो महिलांसाठी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘सरकारनामा’वर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, राज्य सरकारकडून तब्बल ५० लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवले जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

आयकर विभागाकडून मिळणाऱ्या माहितीवर आधारित पात्रता तपासणी

राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेतील अर्जदार महिलांच्या वार्षिक उत्पन्नाची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. सरकारनामाच्या माहितीनुसार, यासाठी आयकर विभागाकडून लाभार्थींच्या उत्पन्नाची अधिकृत माहिती मागवली आहे. योजनेच्या अटींनुसार, ज्यांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्या महिलांना इथून पुढे आर्थिक मदत मिळणार नाही.

मे-जूनचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता, पण घोषणा नाही

लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याला ₹1500 जमा होतात. मात्र जून महिना सुरु झाला तरीही अनेक महिलांच्या खात्यात मे महिन्याच्या हफ्त्याची रक्कम जमा झालेली नाही, त्यामुळे त्या चिंतेत आहेत. मे आणि जूनचा हप्ता एकत्र वटपौर्णिमेच्या दिवशी जमा होऊ शकतो, अशी शक्यता आहे. मात्र, सरकारकडून यासंदर्भात अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

निवडणुकीपूर्वीची योजना, आता कठोर तपासणी

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. त्यानंतर ती राज्यभर लोकप्रिय झाली. आजवर सुमारे २.५ कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. मात्र, आता काही महिलांनी अयोग्य माहिती देऊन लाभ घेतल्याचे उघड झाल्यानंतर सरकारने कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

विरोधकांचे प्रश्न अन उत्तराची प्रतीक्षा

विरोधकांकडून या योजनेवर सातत्याने शंका उपस्थित केल्या जात आहेत. एकीकडे सरकार योजनेवर बंदी नाही असे सांगते, पण दुसरीकडे लाभार्थी महिलांसाठी नियम कडक केले जात आहेत. ‘सरकारनामा’च्या वृत्तानुसार जर ५० लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरले तर राज्यातील अनेक महिलांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : लाडकी बहिण योजनेतील गडबड मान्य; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच मोठ वक्तव्य.

Share This Article