Universal Pension Scheme India 2025 : सामान्य नागरिकांना वृद्धावस्थेत आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र सरकारने Universal Pension Scheme सुरू करण्याची तयारी केली आहे. देशातील प्रत्येक पात्र नागरिकाला ६० वर्षांनंतर दर महिन्याला निश्चित रक्कम पेन्शन स्वरूपात मिळावी, हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. विशेषतः असंघटित क्षेत्रातील कामगार, छोटे व्यापारी, स्वयंरोजगार करणारे नागरिक, तसेच बांधकाम मजुरांसाठी ही योजना वरदान ठरणार आहे.
श्रम आणि रोजगार मंत्रालयाकडून या योजनेवर सध्या काम सुरू असून, ही योजना लवकरच संपूर्ण भारतभर लागू केली जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. वयोवृद्ध नागरिकांना वृद्धापकाळात भेडसावणाऱ्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ६० वर्षांनंतर प्रति महिना ३ हजार रुपये पेन्शन मिळणार आहे.
ही योजना आधीपासून सुरू असलेल्या ‘प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना’ आणि ‘राष्ट्रीय पेन्शन योजना’ यांच एकत्रीकरण करून राबवण्यात येणार आहे. दोन्ही योजनांमध्ये लाभार्थ्यांना त्यांच्या वयावर आधारित रु. ५५ ते रु. २०० दरम्यान मासिक योगदान द्यावे लागते. एवढेच नव्हे, तर सरकार देखील त्याच प्रमाणात योगदान देणार आहे. यामुळे लाभार्थ्याच्या खात्यात दरमहा ठराविक रक्कम जमा होणार असून, ६० वर्षांनंतर नियमित पेन्शनचा लाभ मिळणार आहे.
या नव्या योजनेत अटल पेन्शन योजनेचाही समावेश करण्यात येण्याची शक्यता आहे, त्यामुळे भविष्यात या योजनेचा आणखी व्यापक विस्तार होण्याची चिन्ह आहेत. योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक त्या प्रक्रियांचे नियोजन सुरू असून, लवकरच सरकारकडून अधिकृत घोषणा केली जाण्याची अपेक्षा आहे.
विशेषतः बांधकाम कामगार, श्रमिक, शेतीवर आधारित कामगार आणि इतर असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना वृद्धावस्थेतही आर्थिक सुरक्षितता मिळावी, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. सध्या देशातील अनेक वृद्ध नागरिक निवृत्तीनंतर उत्पन्नाच्या स्रोताविना जगत आहेत. Universal Pension Scheme हे चित्र नक्कीच बदलेल.
हेही वाचा : ६ जून २०२५ रोजी देशभरात सुट्टी जाहीर; शाळा, बँका, सरकारी कार्यालये राहणार बंद.