Namo Kisan Yojana Hapta Update : राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी सन्मान योजनेतुन (Namo Shetkari Yojana) सरकारकडून दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. याच योजनेत आता ६ ऐवजी ९ हजार रुपये देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी चार महिन्यांपूर्वी दिले होते. या हफ्ता वाढीमुळे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या ६ हजारांसह एकूण १५ हजार रुपयांचा लाभ मिळणार होता. मात्र, अद्यापही त्या आश्वासनावर कोणतीही ठोस अंमलबजावणी झालेली नाही.
मुख्यमंत्र्यांनी योजनेचा पुढील हप्ता खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी देण्याचेही संकेत दिले होते. मात्र, या निर्णयासाठी आवश्यक असलेली सुमारे ३ हजार कोटींची अतिरिक्त तरतूद नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही रक्कम कशी आणि केव्हा मंजूर केली जाईल, याबाबत कृषी विभागही प्रतीक्षेत आहे.
राज्यात नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी तब्बल ९३ लाख शेतकरी पात्र ठरले आहेत. या योजनेसाठी ‘अॅग्रीस्टॅक ओळख क्रमांक’ बंधनकारक करण्याची घोषणा झाली असली तरी, प्रत्यक्षात अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. कृषी विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारकडून यासंदर्भातील स्पष्ट सूचना दिल्या जात नाहीत तोपर्यंत जुने नियमच लागू राहतील. मात्र, एकदा नवे आदेश आले की केवळ अॅग्रीस्टॅक क्रमांक असलेल्या शेतकऱ्यांनाच पुढील हप्त्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यात मान्सून दाखल झाल्यामुळे शेतकरी सध्या खरीप पेरणीच्या कामात व्यग्र आहेत. बी-बियाणे आणि खतांच्या खरेदीसाठी या योजनेतील हप्ता अत्यंत उपयुक्त ठरू शकतो, मात्र योजनेच्या पुढील हप्त्याविषयी सरकारकडून कोणतीही स्पष्टता न आल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. ६ हजारांऐवजी ९ हजार रुपये मिळतील, असे सांगितले गेले असले तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे अनेकांच्या अपेक्षा धुसर झाल्या आहेत.
हेही वाचा : जेष्ठ नागरिकांसाठी खास योजना! सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणुकीचा उत्तम पर्याय.