मुंबई | हवामान अपडेट : Maharashtra Weather Alert 10 June Heavy Rain Warning — महाराष्ट्रात यंदा मान्सूनने लवकर प्रवेश केला असला तरी, पावसाने काही दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. परिणामी अनेक भागांत उष्णतेची तीव्रता वाढली आहे. दरम्यान, हवामान विभागाने 11 ते 13 जूनदरम्यान कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
कोकणात पावसाचा जोर वाढणार
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसासह काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. 13 जून रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये 60 किमी/तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा अंदाज
पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांत 10 जूनपासून पावसाची सुरुवात होणार असून, 13 जून रोजी वाऱ्याचा वेग 50 ते 60 किमी/तास पोहोचण्याचा इशारा दिला गेला आहे. घाटमाथ्यांवर पावसाचा जोर अधिक राहील, त्यामुळे प्रवाशांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्याचा इशारा
औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, धाराशिव या मराठवाड्यातील जिल्ह्यांतही मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवली गेली आहे. तसेच, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, बुलढाणा, वाशिम या विदर्भातील जिल्ह्यांमध्येही वाऱ्याचा वेग 50-60 किमी/तासापर्यंत जाऊ शकतो.
शेतकऱ्यांना आणि नागरिकांना खबरदारीचा इशारा
हवामान विभागाने शेतकऱ्यांना आपल्या पीक आणि साठवलेल्या मालाचे संरक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, नागरिकांनी झाडांच्या खाली थांबणे, हलक्या पत्र्यांच्या छपराजवळ जाणे टाळावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
हेही वाचा : कन्यादान योजनेत मोठा बदल; अनुदानाच्या रकमेत वाढ.